Wednesday 20 June 2012

माझा शिवबादादा

 माझा शिवबादादा



छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राचं दैवत. चतुर, मुत्सद्दी, दूरदर्शी, पराक्रमी, आघाडीवर राहून लढणारा जाणता राजा! दुसर्‍या धर्माचा द्वेष न करता आपला धर्म पाळता येतो हे दाखवणारा लोकहितदक्ष राजा! आज त्यांचे अभिमानी पुष्कळ आहेत, पण लोक खर्‍या शिवाजी महाराजांना कधी ओळखतील? एक ललित चिंतन.
————————————————————————————
मध्यंतरी दिल्लीला एका अभ्यासकाला भेटण्याचा योग आला. त्याच्या संशोधनाचा विषय वेगळाच होता. पण त्याने जाता जाता एक छोटा अभ्यास म्हणून शिवाजीवरही निबंध लिहिला होता. त्यात अलेक्झांडर आणि नेपोलियनशी त्याने तुलना केली होती. शिवाजीच्या बर्‍याच जमेच्या बाजू आणि काही मर्यादा दाखवल्या होत्या. त्याने मांडलेल्या मतावर त्याने मला मत विचारले. मी विचारात पडलो. म्हणालो, ‘‘मला नाही बुवा यात काही सांगता येत. कारण शिवाजी हा इतका माझा आहे, की त्याविषयी मला क्रिटिकली, टीकाकाराच्या दृष्टीतून काही विचारच करता येणार नाही.’’ माझ्या या म्हणण्याचे त्याला खूप आश्चर्य वाटले. पण खरंच आहे ना ते. माझी सगळी लहानपणाची घडण शिवाजीबरोबरच नाही का झाली? जेव्हा वाचता येऊ लागलं तेव्हा ब. मो. पुरंदर्‍यांची वेगवेगळ्या गडांची नावं असलेली पुस्तकं अधाशासारखी रंगून रंगून वाचली होती. त्याच्या धैर्याचा, शौर्याचा, सगळ्याचा आपल्यावर केवढा खोलवर परिणाम झाला, ते विसरणं शक्य आहे का?
अलीकडे त्याचे अभिमानी लोक जागोजाग दिसतात. त्यातला मी नाही. ते ‘शिवाजी महाराज’ म्हणावे असा आग्रह धरतात. काही तर ‘छत्रपती शिवाजी महाराज’ म्हणतात. मला शिवाजी म्हणायला आवडतं, आणि तेही ‘तो शिवाजी’ असं. कृष्णाला आपण श्रीकृष्णमहाराज म्हणतो का? संतांनी विठ्ठलाला विठ्ठलेश्वर नाही केलं. ते तर त्याला ‘विठ्ठला’, ‘विठोबा’ अशी एकेरी हाक मारतात. कोणी संत, ‘विठूराया’ म्हणते, तर कोणी आपुलकीने ‘विठ्या’ही. संत ज्ञानेश्वर महाराज हे कानाला बरे वाटते, की आपल्या ग्यानबा-तुकाराममधला ग्यानबा किंवा ज्ञानोबामाउली-तुकाराममधला ज्ञानोबा? अलीकडे जन्मलेल्या, म्हणजे डॉ. आंबेडकर, म. फुले, गांधीजी यांना ते तसेच प्रिय असूनही आपण अशी जवळीक दाखवत नाही. असं का असं विचाराल, तर माहीत नाही.
नावावरून आठवलं. व्ही. टी. स्टेशनचं नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ केलं गेलं. मला याचं तेव्हा आश्‍चर्य वाटलं होतं. त्यापेक्षा साधं-सोपं ‘शिवाजी’ टर्मिनस नाव दिलं असतं तर? लोकांच्या तोंडी शिवाजीचं नाव आलं असतं. त्यावरून कदाचित एखादवेळेस कुणाला त्याच्या कर्तृत्वाची आठवणही आली असती. आता ते झालंय केवळ ‘सी. एस.टी.’! तेच विमानतळाविषयीही झालंय. नावं देताना अशी विशेषणं लावली की मूळ उद्देश बाजूला पडतो, हे नावं देणार्‍यांच्या कसं लक्षात आलं नाही?
लहानपणी शिवाजी माझ्या स्वप्नातही यायचा. आमच्याकडे दीनानाथ दलालांनी काढलेलं शिवाजीचं चित्र ङ्ग्रेम करून लावलेलं होतं. ते धारदार नाक, त्या डौलदार मिशा, ती टोकदार दाढी…पण मला एक उणीव नेहमीच जाणवली ती म्हणजे त्याचं समोरून काढलेलं एकही चित्र मी पाहिलं नव्हतं. त्या काळात मी पाटीवर सारखे शिवाजीचेच चित्र काढायचो. तसेच नाक, मिशी, दाढी…कपाळावर शिवाचे आडवे तीन पदरी गंध…डोक्यावर मागे वळ्यावळ्यांनी बनलेला शिरेटोप काढायचो. तसाच मागे जाणारा तुरा, खाली लोंबणारा मोत्यांचा झुपका…मी मोती न् मोती मन लावून काढायचो. आमच्या घरासमोर एक देऊळ होते. ते माझे विश्वच जसे. तिथल्या दारांवर खडूने शिवाजी काढायचो. तुळयांवर खडूने अशी ऐतिहासिक काव्यांची वाक्ये लिहून ठेवायचो. एक आठवतंय, ‘मुक्या मनाने किती उडवावे शब्दांचे बुडबुडे, तुझे पवाडे गातिल पुढती तोफांचे चौघडे.’ आणि हो, मी पोवाडेही म्हणायचो. डोक्याला एखादे फडके फेट्यासारखे बांधून. सगळंच इतकं शिवाजीमय, की एक थोडासा गोलाकार खड्डा असलेल्या दगडाला आम्ही शिवाजीच्या घोड्याचा उठलेला पाय म्हणूनच दाखवायचो.
अलीकडे एका राजकीय पोस्टरवर शिवाजीचे डोळे वटारलेले चित्र पाहिले. मनात म्हणालो, ‘नाही, नाही. असा तो उग्रट नव्हता रे भाऊ. तो शांत, संयमी, माणुसकीचा जिव्हाळा असलेला माणूस होता. प्रसंगी तो रागावतही असेल, पण ते प्रसंगीच. लोकांना त्याच्या जवळ जावेसे वाटायचे. मनातले बोलावेसे वाटायचे. मनात आलेला नवा डावपेच सांगावा, असे वाटून तो निर्भयपणे शिवबादादाला सांगता यायचा. निदान माझा शिवाजी तरी तसा होता. अलीकडे काहीजणांनी त्याला मुस्लिमविरोधी भावनांचंही प्रतीक केलंय. शिवाजीदादा, सांग रे या लोकांना, की तू नव्हतास तसा. किती देवळांबरोबर मशिदींना तू अनुदानं दिलीस. किती मुस्लिम सैनिक, सरदार तुझ्या सैन्यात होते. आणि ते केवढे तुझे जिवाभावाचे होते. अंगरक्षक, हेर, किती किती सांगावं….
तर ते जाऊ द्या. आपला शिवाजी आपण सांभाळू यात. पुरंदर्‍यांचा ‘राजा शिवछत्रपती’ हा मोठा ग्रंथ आला. नंतर रणजित देसाईंचं ‘श्रीमान योगी’ आलं. त्यातलं उजवं-डावं कसं सांगणार? कुठलंही पान उघडावं आणि वाचत बसावं आणि शिवाजीचं बोट धरून लहान होऊन जावं. तसा शिवाजी लहानशा जहागिरीचा जहागीरदार. वडील मोठे सरदार असले, तरी ते कुठे तरी लांब, धावपळीत. तरी या पोरानं स्वराज्याचा डाव मांडला. सवंगडी जमवले, सगळ्या पोरांनी स्वराज्याची शपथ काय घेतली, सगळंच अजब. (ज्ञानेश्वरांच्या बाबतीत हेच आश्‍चर्य वाटतं. एवढ्या वीस-बावीस वर्षांच्या तरुण पोरास हे कुठून आलं शहाणपण? तसंच शिवाजीविषयीही वाटतं.) हे राज्य आपलं नाही, हे त्याला कसं कळलं असेल? त्याला त्याची जहागीर हेच राज्य का नाही वाटलं? हे त्याचं स्वप्न उपजतच होतं की काय? मग लक्ष जातं जिजाऊ, जिजाबाई, जिजामाता यांच्याकडे. काय म्हणावं तिला? शिवबाची आई, ती आपली आज्जीच नाही का? तर त्या आज्जीनं कसं घडवलं असेल त्याला? शहाजीराजानं ही फार जोखमीची जबाबदारी सोपवली. आपल्या आज्जीने किती शांतपणे, मागे राहून निभावली! आजीचा चेहराच येत नाही डोळ्यांसमोर. सीरियलमध्ये दाखवतात तशी सुंदर, तरुण…हे मन स्वीकारतच नाही. ती असणार मध्यमवयातली. तिचा चेहरा सुंदर नसणार, पण त्यावर शहाणपणाचे तेज असणार. त्यात कणखरपणा असेल. पण सदासर्वकाळ कणखरपणा कसा असेल? शिवाजी स्वारीवर गेल्यावर त्याची काळजी करत बसणार्‍या आपल्या आज्जीचा चेहरा कसा असेल? आणि आग्र्‍याला लाडक्या नातवासह शिवाजी गेला तेव्हा हृदयाचं पाणी पाणी झालं असेल…तेव्हा तर वार्धक्याने चेहरा सुरकुतलेला असणार. राज्याभिषेकासाठी आजीनं जसा जीव धरून ठेवला होता! तो झाला आणि संपलंही ते कृतार्थ जीवन, केवळ पंधरा दिवसांत. काय या मायलेकरांचं नातं असेल नाही? घरचा कारभार बघणं, सुनांना आपलंसं करणं, मुलाच्या अपरोक्ष राज्यकारभार सांभाळणं, बापाचा सहवास मिळत नाही म्हणून रुसलेल्या नातवाला माया लावणं…बाप रे किती गुंतागुंतीचं जीवन होतं आपल्या या आज्जीचं!
शिवाजीचा जन्म झाला तो शिवनेरी गड आमच्या ओतूरजवळच. अनेकदा तिथं सहली गेल्या होत्या. सिंहगडही पुण्याच्या परिसरातला. त्यामुळे तिथंही बर्‍याचदा जाणं-येणं. पण इतरांना अशा ठिकाणी गेल्यावर जशा वेगळ्याच संवेदना होतात तशा मला झाल्या नाहीत. काही पडके, दोन-चार दरवाजे… हे पाहून काय वाटणार? मला या किल्ल्यांची ही दुर्दशा करणार्‍या ब्रिटिशांचा संताप येतो. आश्‍चर्यही वाटतं. इतकं जुनं जपणारे लोक ते. त्यांना म्हणे परत या गडांच्या आधाराने बंड होईल अशी भीती होती, म्हणून त्यांनी ते उद्ध्वस्त केले! अरे, ब्रिटिशांनो, ङ्गार तर तटबंदी काही ठिकाणी पाडायची होतीत. पण आतल्या सगळ्या इमारती, घोड्यांच्या पागा, तलाव, रस्ते, बाजार…यांनी काय केलं होतं तुमचं वाकडं? मी कधी स्वप्न पाहतो, हे सगळे किल्ले, त्यातल्या इमारती अगदी जशाच्या तशा आहेत. त्यांची छपरे तशीच आहेत त्या भिंतींवरची चित्रेही तशीच. अगदी तक्के, गालिचे, झुंबरंही तशीच. किल्ले पूर्वी जसे होते, तसे राहिले असते तर तिथे शाळेच्या सहली आल्या असत्या. शिवबादादा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला असता. तर मला कदाचित तिथं शिवबादादा भेटला असता, आज्जी भेटली असती. तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलो असतो आणि म्हणालो असतो, ‘आज्जी, मला आपल्या शिवबादादाच्या लहानपणच्या गोष्टी सांग ना!’
सगळ्या पराक्रमातली अफजलखानाच्या वधाची हकीगत मला ङ्गार आवडते. किती वेळा वाचली असेल, पण तरी कंटाळा म्हणून येत नाही. ते ‘थ्रिल’ आजही सोडून गेलं नाही. तो खान विजापूरहून निघाला- मंदिरं फोडत, वगैरे. तो डिवचत होता शिवबाला. पण संयम बघा याचा. त्याला तो प्रतिकार करायला, वीरश्री गाजवायला बाहेर पडला नाही. नको ते साहस त्याने केलं नाही. इतका हाहाकार कानावर येऊनही शिवाजी शांत कसा राहिला? आणि ते घाबरल्याचे नाटक? खूप वर्षांपूर्वी वसंत व्याख्यानमालेत आचार्य अत्र्यांचे भाषण होते. अध्यक्षस्थानी दत्तो वामन पोतदार. अत्र्यांनी त्या दिवशी अफजलखानाच्या वधाचे जसे आख्यानच लावले. खानाला कसा खेचून आणला वगैरे…शेवटी त्यांनी सांगितले, ‘शिवाजीने वाघनखांनी खानाचा कोथळा बाहेर काढला, हे खरे नाही. त्याने कट्यार लपवून नेली होती. त्या कट्यारीने पोट फाडले’…वगैरे. दत्तो वामन अध्यक्षीय भाषणात मिश्किलपणे म्हणाले, ‘‘त्याने वाघनखं चालवली की कट्यार हे मला सांगता येणार नाही. कारण ते पाहायला मी तिथं नव्हतो!’’ हास्यकल्लोळ थांबल्यावर म्हणाले, ‘‘खानाला मूर्ख समजू नका. त्याला तो प्रदेश चांगला माहीत होता. किती तरी वर्षं तो वाई प्रांताचा सुभेदार होता!’’ (आणि नंतर सदाशिव आठवल्यांनी सांगितलं, की आपण कदाचित परत येणार नाही म्हणून खानानं आपल्या सर्व बेगमांचा वध केला. त्यांच्या कबरी आजही तिथं आहेत.)
या वाक्याने माझे विश्वच जसे हलले. मग मी वाचलेली ती पुस्तके, त्या कथा? थोडं अधिक समजून घ्यायची जबाबदारी आली आता. मग खान शिवबाच्या हातात कसा सापडला? हे माझं कुतूहल शमवलं पाचगणीच्या दीक्षित सरांनी. डॉ. नलिनी गित्यांबरोबर त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी ब्रिटिशकाळापासून आजवर अनेकांना तो परिसर हिंडवून आणलाय. ते म्हणाले, ‘‘शिवाजीचे डावपेच अभ्यासावर आधारलेले होते. खान येणार, कळल्यापासूनच त्याचा अभ्यास शिवाजीने सुरू केला. मागे कुठे खानाने असाच वेढा घातला होता. आतल्या राजाला त्याने वाटाघाटीसाठी बोलावले. त्याला अभय दिले, शब्द दिला. म्हणून तो राजा गडाबाहेर भेटायला आला. आणि त्याला खानाने मारून टाकले. असे आणखी एका ठिकाणीही त्याने केले होते. हे कळल्यावर शिवाजीने डावपेच आखले. ज्या ‘मोडस ऑपरेंडी’ची खानाला सवय होती, जी नेहमीची, हात बसलेली युक्ती होती, ती टाळण्याऐवजी शिवाजीने ती मुद्दाम वापरली. मनुष्यस्वभावाचा कसा अचूक अंदाज होता त्याला! वा:! वा:! दादा, यू आर ग्रेट!’’
लहानपणी एक प्रसंग वाचायला ङ्गार आवडायचे. रायबागन आणि कातरलबखानाला कोकणात जाणार्‍या खिंडीत गाठल्याचा प्रसंग. त्या रायबागनचा तोराच उतरवला शिवाजीने. शाहिस्तेखानाच्या छावणीत, पुणे शहरात काही निवडक स्वारांसह शिवाजीने जाणे, हे केवढे धाडस! कोणता राजा असे करू शकेल हो? पण शाहिस्तेखानाला असा काही मानसिक झटका बसला की पूछो मत. औरंगजेबाचा तो मामा. म्हणजे धक्का थेट दिल्लीपर्यंत पोहोचला असणार. शाहिस्तेखान चंबूगबाळं उचलून चालताच झाला दिल्लीला.
तो राजा असला तरी इतर राजांसारखा नव्हता. सैन्याला हुकूम देऊन स्वत: मागे सुरक्षित राहणारे राजे अनेक होते. पण हा आघाडीवर राहणारा राजा होता. सर्वांत धोका पहिल्या ङ्गळीला. तिथेच हा, अगदी पुढे. त्याच्या या गुणांवरच त्याचे सहकारी, सैनिक फिदा असले पाहिजेत. स्वत:पेक्षा कसल्या तरी मोठ्या उद्देशासाठी हे चाललंय, त्या ‘कसल्या तरी’ उद्देशासाठी स्वत:चा जीवसुद्धा द्यावा? हा उद्देश फक्त शिवाजीची जहागीर वाढवायचा उद्योग नाहीये, हे सर्वांना शिवाजीच्या या ‘धडक’ कृतींमधून कळत असावं. अशी जिवाला जीव देणारी माणसं किती मिळवली असतील त्यानं? इतिहास फक्त काही निवडकांची आठवण ठेवतो. पण इथे तेही इतके भरभरून आहेत की बस्स! ओतूरच्या शाळेच्या स्नेहसंमेलनात आम्ही ‘गड आला पण सिंह गेला’ या नाटकातला प्रवेश केला होता, (किंवा त्यावरची एकांकिका असेल). त्यात कोंढाणा घ्यायचा त्याच वेळी तानाजीच्या पुतण्याचं रायबाचं लग्न येत होतं. आमच्या वर्गातला पोरगा तानाजी झाला होता. त्याचं वाक्य आठवतंय, ‘‘आधी लगीन कोंढाण्याचं, मंग रायबाचं!’ तो हे वाक्य इतकं जोरात ठासून म्हणायचा की अंगावर शहारे यायचे. आणि कोंढाणा घेतलाच त्यानं. पण रायबाच्या लग्नाला ‘काही अपरिहार्य’ कारणाने हजर राहू शकला नाही. काय जिव्हारी लागलं असेल शिवाजीला! सुख निर्भेळ मिळूच नये का? नेत्रदीपक यशात काही जिवाभावाचे सहकारी, सवंगडी गमावणे, हा काय योग आहे हो? कसं पचवत असेल तो असं दु:ख?
काय वातावरण निर्माण केलं असेल शिवबानं! सर्वसामान्य माणसं जिवाला जपतात आणि शूर प्राणांची आहुती देतात, असं नेहमीच ऐकलेलं. पण जेव्हा सर्वसामान्य माणसंच उठतात अशी आहुती द्यायला तेव्हा? काय म्हणायचं त्याला? बाजीप्रभूचं बलिदान तर कोरलं गेलंय इतिहासात, आपल्या मनात. मला आणखी कुणाची आठवण होते. शत्रूला फसवून बुचकळ्यात टाकण्यासाठी शिवाजीसारख्या दिसणार्‍या काही शिपायांना पालखीत बसवून त्या वेढ्यात पाठवल्या गेल्या. ते पकडले गेले. पुढे काय होणार ते या शिपायांना ठाऊकच होतं. तरीही ते शिवाजीसारखे सजून पालखीत बसले? का बरं? तसंच ‘आग्र्‍याहून सुटका’च्या बाबत. शिवाजीच्या जागी कोण तो पडून राहिला? कोणी आते-मामे भाऊ? छे हो. तो आपल्या स्वराज्यातला कोणी साधा शिलेदार. काय अभिनय वठवला असेल त्यानं! रंगभूमीवर कुठल्या नटाने असा मृत्यूच्या छायेत अभिनय केला असेल?
मला त्या आपल्या संभाजीबाळाचंही नवल वाटतं. आग्र्‍यात ते पोर घाबरलं नाही. पळून जाताना हूं की चूं केलं नाही. उरलेला प्रवास वडलांविना, अनोळखी भागात, रानावनातून कसा केला असेल त्यानं? संभाजीला समजून घेण्यात आम्ही सगळे कमीच पडलो. शिवबाने आपल्या राज्याभिषेकाबरोबर त्याचा युवराज्याभिषेक करूनही त्या सगळ्या अमात्य मंडळींनी गृहकलह सुरू करावा? परवा तर वाचलं, की सोयराबाईला त्यानं भिंतीत चिणून मारलं, याला काही पुरावा नाही. त्यानंतर दीड वर्षाने विष खाऊन किंवा विषप्रयोग होऊन ती गेली. ज्या अमात्यांना देहान्त सजा दिली त्यांच्याच मुलांना त्याने परत मंत्रिमंडळात घेतले. याहून त्याच्या शहाणपणाचा, समतोल बुद्धीचा काय पुरावा पाहिजे? घरावर रुसून (त्यात कार्यमग्न शिवाजी किंवा सावत्र आई यांचा सहभाग असणे शक्य आहे.) दिलेरखानाला मिळाला, त्याच्यावरचा मोठा डाग. पण पुढे त्याने खानाच्या ङ्गौजेचं गाव लुटणं पाहिलं, एका स्त्रीस खानाने मुसलमान करून जनानखान्यात ठेवली, ते पाहिल्यावर तो स्वत: होऊन परत घरी निघून आला. चूक झाली. चुका कोण करत नाही? पण चूक सुधारली ना त्यानं? वडलांनंतर जेमतेम सात-आठ वर्षंच मिळाली, पण तो त्यात सतत लढायाच करत राहिला. पोर्तुगीज, मोगल या सगळ्या आघाड्यांवर. खाली थेट कर्नाटकात जिंजीपर्यंत. तर तिकडे मराठवाड्यात. अशा नुसत्या लढायांत वेळ गेला. तो व्यसनाधीन आणि लंपट असता तर हे जमलं असतं? तो संस्कृतमधला इतका जाणकार, की त्याने संस्कृतात काव्यग्रंथ लिहिलाय. उन्मत्त वतनदारांना जरब बसवणारी त्याची आज्ञापत्रं पाहिली की थेट शिवबादादाचीच आठवण यावी. आणि मरण? मरणातच तो असे जगला की अंगावर शहारेच येतात. ते नुसते युद्धातले मरण नव्हे. ते विटंबना करून दिलेले मरण…काय त्याची ती धिंड…छे छे वाचवत नाही तो भाग. त्याच्या गुणांमध्ये, व्यक्तिमत्त्वात, निष्ठेमध्ये जरा कमतरता असती, तर तो अशा वेळी पिचला असता आणि शरण गेला असता औरंगजेबाला. पण त्या मरणात तो असे जगला की सर्व मराठी शिपायांच्या डोक्यावर जसा स्वार झाला. आणि तिथून सुरू झाले एक विलक्षण, निर्नायकी युद्ध. या पर्वाला सलाम, नमस्कार, हॅट्‌स ऑफ…कितीही शब्द वापरा, पण नाहीच कशाची सर त्याला. ते युद्ध या निनावी शिपायांचं. प्रोत्साहन द्यायला, डावपेच आखायला, पाठ थोपटायला तिथं शिवाजी-संभाजी नव्हते. राजाराम दूरस्थ. कोणी श्रेयासाठी हे करत नव्हते की इनाम, वतनासाठी. शांत, अविरत, निश्‍चयी लढाई. आपण असू तेच रणांगण. आपण एकटे असलो तरी तीच ङ्गौज. शत्रूचं बळ किती का असेना! अखेर औरंगजेबाला दिल्ली सोडून इकडे यावे लागले. तरी त्याला हे थैमान आवरेना. शेवटी इथंच त्याचा मृत्यू झाला. एक संताजी, धनाजी सोडले तर त्या विलक्षण वीरांची नावंही माहीत नाहीत आपल्याला. या अनामिक वीरांचं एखादं चांगलं स्मारक का असू नये? संभाजीच्या मृत्यूनंतरच्या या लढ्याची चांगली आठवण का असू नये? व्हिएतनाम युद्धात मरण पावलेल्यांचं वॉशिंग्टनमध्ये एक स्मारक आहे. तिथे कुठलाही पुतळा नाही. तिथं आहे लांबलचक ग्रॅनाइटने मढवलेली एक भिंत. त्यावर कोरली आहेत त्या सैनिकांची नावं. त्यांचे नातेवाईक, मित्र येऊन त्यापुढे ङ्गुले ठेवतात. हृदय गलबललंच आपलं, भाऊ. पण आपल्याकडे स्मारक म्हटलं, की ते एकसुरी पुतळे आठवतात, तलवार उपसलेले. मला एक प्रश्‍न नेहमी पडतो, की शिवाजी आम्हाला फक्त एवढाच का दिसतो? खरं पाहता इतक्या बहुपदरी माणसाची किती हृद्यतेने आठवण ठेवता येईल! पण आपणा सगळ्यांना आपला हा शिवाजी किती बहुपदरी होता, तो किती वेगवेगळ्या प्रकारे मोठा होता, हे का नाही समजू शकत? आमच्याच माणसाचे मोठेपण आम्हीच समजू नये?
तो नुसता गनिमी काव्याने लढू शकत होता असे नाही. साल्हेरच्या लढाईचा वृत्तान्त (डॉ. श्रीनिवास सामंत यांच्या पुस्तकात) वाचला. तर बाप रे! ती सपाटीवरची, समोरासमोरची लढाई! शिवाजीने ङ्गौजेचे वेगवेगळे भाग करून अशी काय जिंकलीय की बस्स! कोणी म्हणू शकणार नाही, तो ङ्गक्त सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांत लढू शकत होता, असे. जो लढणारा आहे, आपण कशासाठी लढतोय याचे ज्याला अचूक भान आहे, शत्रूच्या कमतरतांचा ज्याने अभ्यास केलेला आहे आणि स्वबळाची वास्तव कल्पना आहे…असा तो शिवाजी.
थंड डोक्याने वेगळ्याच कल्पना शोधणारा शिवाजी. सतत ‘प्रो-ऍक्टिव्ह’. शत्रूंच्या डावपेचांमागे तो फरफटत गेला नाही. शत्रूला कल्पना यायच्या आत त्याच्यावर झडप घालून शत्रूच्या मर्मावर हल्ला करायचा. असा तो शिवाजी!
शिवाजीच्या बाजू तरी किती! प्रत्येक बाबतीत त्यानं कसं लक्ष घातलं? इंग्रज, पोर्तुगिजांचं आरमारी बळ पाहून त्याने स्वत:चं आरमार बनवायचं ठरवलं. हीच एक क्रांतिकारक कल्पना. त्या वेळच्या समाजात समुद्रपर्यटन निषिद्ध होतं. बंदी होती धर्माची. ती शिवबाने सहज ओलांडली. तेही त्या जमान्यात. पण त्याने इंग्रज पोर्तुगिजांच्या गलबतांची नक्कल नाही केली. त्यांची जहाजे मोठी, खाली ‘व्ही’च्या आकाराची, निमुळती होत गेलेली. लांबच्या प्रवासाला ती उपयुक्त. पण शिवबादादाने इथला विचार केला. त्याची गरज काय हे ओळखून सपाट तळाच्या छोट्या होड्या बांधल्या. त्या छोट्या होड्या मोठ्या गलबतांवर हल्ले करून नाहीशा होत. एका पोर्तुगीज पत्रात असे म्हटले आहे, की ‘‘हा सीवा कुठून येतो आणि हल्ले करून कुठे गडप होतो ते कळतही नाही.’ शिवाजीने जमिनीवरच्या लढाईत जो गनिमी कावा वापरला, तोच आरमारी युद्धातही. म्हणून गुरू, किती शिकायचंय आपल्याला शिवबादादाकडून! आता आता आपण शस्त्रास्त्रांच्या बाबतीत नुसत्या कॉप्या करतो त्या अमेरिकेच्या. आपलं असं काय आहे की जे आपल्याला अनुरूप आहे? एवढंच काय, त्यांच्या माणसं न लागणार्‍या कारखानदारीचीही आपण नक्कल करतो, इथं लाखो माणसं बेकार बसली असली तरी. काय म्हणावे या अनुकरणाला?
तर नुसत्या अनुरूप बोटी बांधल्या नाहीत, तर समुद्री किल्ले बांधले, सुधारले. उदय संखे यांच्या लेखात शिवबाराजाला दुर्ग-बांधणीची किती नवी दृष्टी होती, हे कळतं. विजयदुर्गच्या आसपास शत्रूच्या बोटी येत आणि फुटत, याचे कारण त्यांना कळले नव्हते. नंतर कळले. त्यांच्या कागदपत्रांत आपल्या कमांडर गुपचूप यांना एक कागद सापडला. शत्रूच्या बोटी विजयदुर्गच्या आसपास फुटत कारण पाण्यातच शिवबाने भिंत बांधली होती. ती वरून कुणाला दिसत नसे, पण गलबते त्यावर फुटत असत. ती भिंत बंदरापासून १५० ते २०० मीटर अंतरावर होती. आणि किती लांब? तर साडेचार किलोमीटर! संरक्षणाची किती साधी पण किती परिणामकारक युक्ती! किल्ल्यांभोवतीचे समुद्रातले खडक तो तसेच ठेवायचा. त्या ‘व्ही’ आकाराच्या बोटी त्या उथळ पाण्यात, खडकाळ भागात येऊ शकत नसत, पण सपाट तळाच्या छोट्या बोटी सरासरा जायच्या. त्यानं या बांधकामात शिसं आणि चुना वापरला. चुना करण्यात शिवबाचे लोक इतके पुढे गेलेले, की पाण्याने किल्ल्याच्या तटांचे दगड झिजले, पण चुना कायम. बोला!
खांदेरीची लढाई हे तर अप्रतिमच नाट्य. हे बेट मुंबईच्या तोंडावर असल्याने त्याने इंग्रजांना चाप बसणार होता. ते ताब्यात घेऊन शिवबाच्या लोकांनी बांधकाम सुरू केले. ते इंग्रजांनी उधळून लावले. पण आपला शिवबादादा किती संयमी! सहा वर्षे थांबला. ‘ठंडा करके खाओ’ ही म्हण त्याच्यात मुरलेली होती. परत काम सुरू. मधल्या काळात बेटावर तोङ्गा चढवलेल्या. इंग्रजांनी नाकेबंदी केली. ते तोङ्गांच्या मार्‍यामुळे जवळ जाऊ शकत नव्हते. तरी बिघडलेल्या हवेचा, वादळाचा ङ्गायदा घेऊन वेढा तोडून मराठे आत जात आणि रसद पुरवत. इंग्रज काहीच करू शकत नसत. मग शिवबाने आवई उठवली (त्याही तंत्रात तो वाकबगार), की ‘पनवेलहून मराठा सैन्य मुंबईवर चाल करून येतंय.’ मग घाबरून इंग्रजांनी मराठ्यांकडे तहाची बोलणी केली, आणि त्यात शिवबाने खांदेरी बेट मिळवलेच.
या लढाईत किती विशेष गोष्टी आहेत बघा. खांदेरी बेटाची अचूक निवड, संयम, छोट्या होड्यांची करामत. त्यातला गनिमी कावा. आवई उठवून शत्रूला संभ्रमात टाकणे. आणि तहात हवे ते मिळवणे. एरवी भारतीय परंपरेत युद्धात जिंकतात पण तहात हरतात. इथे आपला शिवबादादा जिंकलेला नसूनही तहात त्याने मिळवले. क्या बात है दादा!
इतर ठिकाणी शिवबाचे पुतळे उभारण्यापेक्षा, अशा एका खांदेरीवर त्याचं योग्य स्मारक का होऊ नये? तिथं त्याच्या होड्या, पडाव, गलबतांचं प्रदर्शन का भरवू नये? खांदेरीच्या लढाईचं आत्ता शूटींग करून संध्याकाळी त्याचा दृकश्राव्य कार्यक्रम का करू नये?
मी मच्छीमार समाजाची पाहणी करताना अलिबागला गेलो होतो आणि यांत्रिक होडीत बसून जवळच्या एका बेटाला फेरी मारून आलो होतो. आता नकाशात पाहतो तेच ते बेट तर नसेल ना? माहीत असतं तर उतरून मोकळेपणाने श्वास भरून घेतला असता. तेव्हा हे सगळं वाचलेलं असतं तर.
लहानपणी शिवबावरची गोष्टीरूप पुस्तके वाचली होती. नंतर प्रत्यक्ष इतिहासावरची वाचू लागलो. त्यातून माझा शिवबादादा मलाच मस्त उलगडत गेला. त्याची काही आज्ञापत्रे वाचली. ती तर ‘अहाहा’च आहेत. त्यात त्याचं शहाणपण आहे, बारीकसारीक पाहण्याची बुद्धी आहे. एका आज्ञापत्रात तो म्हणतो, ‘गडावर तुम्ही शेकोट्या पेटवता, त्या नीट विझवा. एखाद्या ठिणगीने हा हा कार होईल. तेलाच्या पणत्या विझवून मग झोपा. उंदीर तेलाची जळती वात घेऊन जातील, आणि ती जळती वात गवताच्या गंजीपाशी नेऊन टाकली की गडावरच्या गवताच्या गंजी जळून खाक होतील…’ बघा हा बारकावा. छोट्या गोष्टीतून मोठा उत्पात होऊ शकतो. एक बेजबाबदार दुर्लक्ष सर्वांच्या हिताला केवढे मारक ठरू शकते!
अनवधानाने असं गवत जळालं तर करणार काय? अन्नसाठा? सगळ्याच गोष्टी खालून वर आणायच्या. पण शिवाजीच तो, ज्यानं गडांचा इतका नेमका उपयोग करून घेतला हे त्याचं मुलखावेगळं ‘लॅटरल थिंकिंग!’
आणखी एक आपल्या शिवाजीदादाचं आज्ञापत्र मला ङ्गार आवडतं. आंबे, फणस अशी लाकडं आरमारासाठी म्हणजेच स्वराज्यासाठी आवश्यक. ‘परंतु त्यास हात लावू न द्यावा,’ अशी शिवाजीची आज्ञा होती. का बुवा? आताचं सरकार तर आर्थिक विकासासाठी हव्या त्या जमिनी, गावं ताब्यात घेतं, आणि आपला दादा, ‘रयतेच्या मालकीच्या अगदी उपयुक्त असलेल्या झाडांना’ही हात लावायला मनाई करतो? रस्ते मोठे करताना हजारो झाडांची कत्तल करणारं आताचं सरकार कुठं नि रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, असं सैनिकांना बजावणारा शिवबादादा कुठं! तो नुसती आज्ञा देत नाही, तर त्याचं कारणही सांगतो ‘काय म्हणोन, की ही झाडे वर्षा दोन वर्षांनी होतात, असे नाही. रयतेने ही झाडे लावून लेकरासारखी बहुत काळ जतन करून वाढवली. ती झाडे तोडलीयावरी त्यांचे दु:खास पारावार काय?’ प्रजेला होणार्‍या अशा दु:खांची काळजी करणारा तो राजा होता. त्या काळचे कुठले आदिलशहा, कुतुबशहा, औरंगजेब अशी काळजी करत असतील? पुढे तो त्याचेही कारण देतो : ‘येकास दु:ख देऊन जे कार्य करील म्हणेल ते (कार्य) करणारासहित स्वल्पकाळे बुडोन नाहीसे होते. धन्याचे पदरी प्रजा पीडण्याचा दोष पडतो. या वृक्षांच्या अभावी हानीही होते.’ हे चिंतन त्या काळामधले. बरे, मग स्वराज्याची आरमाराची गरज भागवावी कशी, तर शिवाजीचे म्हणणे असे की, ‘एखादे झाड, जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल, तर धन्यास राजी करून, द्रव्य देऊन, त्याचा संतोष करून तोडून न्यावे. बलात्कार सर्वथा न करावा.’ बोला आता. शिवबादादा आत्ता असता तर त्याने धरणग्रस्तांचे हाल होऊच दिले नसते. परकीय कंपन्यांना त्याच्या काळातही कसे दूर आणि धाकात ठेवले असते! आज तो असता तर सेझ कायदा होऊच दिला नसता. पण काय करता? नुसता राज्यकर्त्यांना दोष कसा द्यायचा? आमच्यातच शिवबा पुरेसा मुरलेला नाही. हा दोष आपलाच.
शिवबादादाच्या आज्ञापत्रात तो आज्ञा करताना समजावूनही सांगतो. ‘तुम्ही निष्काळजीपणा केलात तर वैरण पेटल्याने नष्ट होईल. मग चार्‍याअभावी घोडे मेले तर तो दोष तुमच्यावर लागेल. तुम्ही त्यासाठी रयतेचे धान्य लुटू लागाल. मग रयत म्हणेल, त्या मोगलांमध्ये आणि यांच्यात ङ्गरक काय? आणि लोकांचा आधार तुटला तर राज्यच कोसळेल…’ असे बरेच. एका पत्रात तर ‘कुणा शत्रूचे सैन्य या मार्गाने येत आहे. गाव उठवा आणि लोकांना घाटात सुरक्षित ठिकाणी लपवा,’ असे लिहिले आहे. मला आठवतेय, नेपोलियनने रशियात धडक मारली होती, तेव्हा गावकर्‍यांनी पलायन केले होते. जाताना आपापली गावे पेटवून दिली. त्यामुळे पुढे हिवाळ्यात तो तिथे सापडला, आणि गावंच अस्तित्वात नसल्याने त्याला माघारी ङ्गिरावं लागलं होतं. त्या गावकर्‍यांचं वागणं शिवबादादाच्या त्या माणसे हलवण्याच्या युक्तीशी किती मिळतं जुळतं आहे. त्यात परत घरं पेटवून देणं ही भानगड नाही. शत्रू पुढे गेला की परत गाव जसंच्या तसं.
तर त्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये सेतुमाधवराव पगडींनी लिहिलेलं छोटं आणि छान शिवचरित्र आहे. अलीकडे गजाजन मेहंदळ्यांचे दोन ग्रंथही छान आहेत. शिवाय सामंतांचे ते फक्त लढायांवरचे पुस्तक. ते तर अप्रतिमच. अ. रा. कुलकर्णी आणि ग. ह. खर्‍यांनी संपादित केलेले ‘मराठ्यांचा इतिहास’चे दोन खंड तर ग्रेटच!
पण सगळ्यात ज्यांनी डोळे उघडले ते त्र्यं. शं. शेजवलकरांच्या पुस्तकांनी. त्यांच्या लेखसंग्रहात ‘रियासत’कार सरदेसाईंच्या ‘नानासाहेब पेशवे’ या पुस्तकाला त्यांनी लिहिलेली प्रस्तावना आहे. त्या लेखाने मला हादरवलेच. पुढे मी त्यांचे बरेच लिखाण, ग्रंथही वाचले. पण जमलेला लेख हाच. त्यांच्या आयुष्याच्या सर्व आकलनाचे गाळीव रूप त्यात आले आहे. पेशव्यांच्या उणिवा, कमतरता सांगताना त्याने समोर शिवाजी आरशासारखा धरला आहे. त्यामुळे पेशवे बाजूलाच राहिलेत. सरदेसाईंचं मोठेपण हे, की त्यांच्या आतल्या पुस्तकाला ही प्रस्तावना सर्वस्वी प्रतिकूल असूनही त्यांनी ती छापलीय. शिवाजीने दिल्ली सत्तेला आव्हान देऊन नवे स्वतंत्र राज्य स्थापन केले, तर पहिल्या पेशव्यांनी दिल्लीला जाऊन अधिकाराची वस्त्रे आणली. थोडक्यात, मांडलिकत्व पत्करले. शिवाजीने आपल्या अर्थव्यवहारासाठी स्वतंत्र चलन निर्माण केले, नाणी पाडली. ‘मुद्रा भद्राय राजते’- आठवतंय ना? ते नुसतं नाणं नाही. एका भूमिपुत्रानं आक्रमक सत्तेला दिलेलं ते आव्हानच आहे. या उलट पेशव्यांनी ती नाणी रद्द करून दिल्लीश्वरांचे चलन स्वीकारले. शिवाजीने मराठी राजभाषा बनवली. त्यासाठी राज्यव्यवहारकोष लिहून घेतले. पण पेशव्यांनी ते परत ङ्गारसीवर आणले. आपल्याला आता पेशव्यांविषयी काही म्हणायचे नाही. पण हे खरे, की पेशव्यांनी शिवाजीला एक ‘कॉन्ट्रास्ट’ पुरवला आहे. थोरले बाजीराव आणि थोरले माधवराव हे चमकून गेले आणि त्यांनी त्यांच्यात भिनलेले शिवाजीचे स्फुल्लिंग दाखवले. पण ते तितकेच. शेजवलकरांनी लिहिलेला ‘पानिपत’ हा तर युद्धशास्त्रावरील अप्रतिम ग्रंथ. आपला मुख्य शत्रू अब्दाली आहे, तर पेशव्यांनी उत्तरेकडे जाताना इतर सर्व छोट्या सत्तांशी तह करत जावे ना… तर त्याऐवजी त्यांना दुखवतच हे पुढे गेले. यमुनेला पूर येण्याआधी अब्दालीला गाठायचे होते, तरी पेशवे ठिकठिकाणी तीर्थक्षेत्री होमहवन करत राहिले. इतक्या लांबचा पल्ला, तरी सर्व कुटुंबकबिला घेऊन सगळे निघाले. आणि व्हायचे तेच झाले. किती मोती गळाले आणि किती खुर्दा सांडला, याचे हिशोब करणे नशिबी आले.
शिवाजी किती वेगळा होता! त्याच्या हल्ल्यात किती आश्‍चर्याचे धक्के असायचे. शत्रूच्या विचारांच्या तो किती पुढे होता! शेजवलकर लिहितात, ‘अब्दाली हा अङ्गगाणिस्तानातला शिवाजीच. थोड्या पण चपळ फौजेनिशी हल्ले करून पळून जाणारा,’ म्हणजे बघा. काळचक्र कसे उलटे झाले! शिवाजीने सुस्त व प्रचंड मोगल ङ्गौजेस हल्ले करून जेरीस आणले. आता शिवाजीच्या जागी अब्दाली आणि मोगलांच्या जागी पेशवे, म्हणजे आपणच. काय हा योग म्हणायचा?
शेजवलकरांचं अखेरचं कार्य होतं शिवचरित्र लिहिण्याचं. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर अभ्यास केला, साधनं जमवली. पण शेवटी तब्येत साथ देईना. त्यांचे एक विद्यार्थी मला सांगत होते, की ते म्हणायचे, ‘थोडा काळ मिळाला तर हे काम पुरे होईल.’ त्या आजाराशी झगडत त्यांनी शेकडो पानांची प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली, प्रत्येक प्रकरणाचा आराखडा लिहिला आणि प्राण ठेवला. नंतर मराठा मंदिर संस्थेने त्यांचा ‘राजा शिवछत्रपती’ हा ग्रंथ छापून प्रसिद्ध केला. काय प्रस्तावना आहे ती! जसा एक प्रबंधच. शिवाजीच्या वेळची भारतातली परिस्थिती, जगातली परिस्थिती, इथली सामाजिक स्थिती, इथला तोपर्यंतचा इतिहास, इथले ङ्गसलेले प्रयोग…काय नाही त्यात? हे जेव्हा वाचले तेव्हा वाटले, आयुष्य दुसर्‍याला द्यायची सोय असती तर मी शेजवलकरांना माझी दहा निरोगी वर्षे देऊन त्यांचे ऋण थोडे तरी ङ्गेडले असते. एवढ्या समग्रपणे पाहणारा इतिहासकार मला दुसरा अजून सापडला नाही.
शिवाजीने आधीच्या वतनदारांना बाजूला सारून ही सर्वसामान्यांतली ङ्गौज जमा केली. अगदी अठरापगड जातींची. कसलीही प्रतिष्ठा नसलेली, पण जिवाला जीव देणारी. त्या अस्थिर जमान्यात लढाया होत्याच; पण तरीही शिवाजीने शेतकर्‍यांना स्थैर्य दिले, प्रोत्साहन दिले. अकबराला जसा राजा तोरडमल किंवा आणखी कुणाला मलिक अंबर मिळाला, तसा शिवाजीला कुणी चांगला प्रतिभावान सहायक मिळायला हवा होता. मग त्याने महसुलाची योग्य पद्धत बसवून त्याच्या स्वप्नातला महाराष्ट्र निर्माण केला असता. पण शिवाजीचे सगळे आयुष्य धावपळीचे. एकूण फक्त जेमतेम पन्नास वर्षे. त्यात एका संकटाशी दोन हात करावे तो दुसरे संकट उभे, ही परिस्थिती. पण त्याही परिस्थितीत त्याने व्यवस्था बसवली, लोकांना स्थैर्य दिले.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, आजच्या काळातही त्याच्या पायाशी बसून धडे घ्यावेत असा त्याचा धर्मविषयक दृष्टिकोन. दुसर्‍या धर्मांचा द्वेष न करता आपला धर्म पाळता येतो, हे त्या वेळच्या मुस्लिम सत्तांना त्याने दाखवून दिले. मोगलांच्या प्रभावळीत अकबर असा होता. अकबराविषयी जेवढे वाचतो तेवढा तो आवडत जातो. वडील हुमायून अगदी विपन्नावस्थेत. अकबरानेही जवळपास शून्यातून सुरुवात करून साम्राज्य उभारले. त्या वेळच्या प्रस्थ असलेल्या मुस्लिम सरदारांपेक्षा त्याने राजपुतांना जवळ केले. काही राजपूत स्त्रियांशी लग्न केले, पण त्यांचा धर्म बदलला नाही. त्यांच्या महालात देऊळ बांधून देवपूजा करण्यास मुभा होती. एवढंच काय, पुढचा वारसही त्यांच्याच पोटचा. त्याने मुल्ला-मौलवींचं प्रस्थ कमी करून मोकळं वातावरण तयार केलं. अगदी बरेचसे गुण शिवाजीसारखेच. कधी वाटतं, अकबर आणि शिवाजी एकाच काळात असते तर? किती ङ्गायदा झाला असता आपल्या सगळ्यांचाच! अकबरानंतर अकबराने तयार केलेले वातावरण विरून गेले आणि त्याबरोबर उलट्या वृत्तीचा औरंगजेब निर्माण झाला. आणि शिवाजीची ही प्रेरणा दुसर्‍या बाजीरावापर्यंत पूर्ण लयाला गेली. हे महापुरुष एकत्र आले असते तर न पुसता येणारी संमिश्र संस्कृती उदयाला येऊन टिकलीही असती. त्या काळात लोकांमध्ये ती होतीच. सूङ्गी संत, भक्ती संप्रदायातले आपले संत यांत विरोध तर नव्हताच, पण एकमेकांकडे आदानप्रदान होते. एकमेकांबरोबर इष्ट परिणाम होत होते. काही संत, त्यांचे गुरू यांना हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही नावांनी ओळखले जायचे. काही मुस्लिम संत तर अगदी भागवत संप्रदायी होते. ते वातावरण मीही माझ्या लहानपणी अनुभवलंय. आमच्या लहानपणी मुस्लिमांचे डोले नाचत यायचे. माझी आई हातात पाण्याचा तांब्या घेऊन दारात उभी राहायची. डोले जवळ आले की घरापुढे रस्ताभर पाणी शिंपायची, त्यांच्या स्वागताला. असे प्रत्येक घराच्या दारात स्वागत. गणेशोत्सवाची सजावट मुस्लिमांकडे, हे मी अनेक ठिकाणी पाहिलंय. अनेक गवय्ये खानसाहेब देवीचे भक्त होते. त्यांनी देवाच्या वर्णनाच्या चीजा बांधल्यात. गेल्या पिढीतले बरेच हिंदू गवई सांगतात, खानसाहेबांनी मला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळून विद्या दिली…अशी अनेक उदाहरणे.
मग कुठं लयाला गेलं सगळं हे ? आधी देशाचे दोन तुकडे झाले. जो मिळाला त्यात ही अशांतता, एकमेकांविषयी संशय, दंगली, बॉंम्बस्ङ्गोट…वगैरे. आणि तरीही आम्ही वारसा सांगतो शिवाजीचा आणि त्याच्याकडून शिकत नाही काही, याला काय म्हणावे?
कधी कधी वाटते, लोक खर्‍या शिवाजीला ओळखतील! शिवाजीला लढाया कराव्या लागल्या. सन्मानाने राहण्यासाठी, आपली जागा तयार करण्यासाठी. ती जागा आधीच उपलब्ध असती, तर त्याने छान, एकोप्याने नांदणारे सुखी राज्य निर्माण केले असते. मग करू या का सुरुवात? आपल्या राजकारण्यांनी, धुरीणांनी जरा शिवाजीकडून शिकावे ना थोडे. एक भव्य स्वप्न उराशी घेऊन उतरावे या गरिबीविरुद्धच्या लढ्यात. अन्नावाचून, औषधावाचून कुणी मरताच कामा नये, अशी करूयात का आपण प्रतिज्ञा? हा नुसता महाराष्ट्र नाही आहे, हे शिवाजीचे स्वप्न आहे. गुंडगिरी, झुंडशाहीला फाटा देऊन आपण होऊयात सर्वसामान्यांचे, निसर्गाचे रक्षक?
तसंच मला, आपल्या अगदी जवळच्या, म्हणजे कर्नाटकमधल्या विजयनगरच्या कृष्णदेवरायाची आठवण होते. कसला पराक्रमी होता तो! शिवाजीने जसं शून्यातून स्वराज्य उभं केलं, तसं त्याचं नव्हतं. त्याच्याआधी दीडेकशे वर्षं ते साम्राज्य चालूच होतं, पण ते मोडकळीला आलेलं होतं. विजापूर, गुलबर्गा इथल्या मुस्लिम सत्तांनी लचके तोडणं, अंतर्गत कलह, हे सगळं चालू होतंच. त्याची (त्याला ‘राया’ म्हणायचे. ते मला ङ्गार आवडलं.) कारकीर्द ती केवढीशी…फक्त वीस वर्षांची. तो वयाच्या अठ्ठेचाळिसाव्या वर्षी गेलाच. पण त्या वीस वर्षांत कसले पराक्रम केलेत! खरंच वाटत नाही. त्या आदिल, कुतुब वगैरे सगळ्या शाह्यांना त्याने सपाटून मार दिला. एकदा नव्हे, तर अनेकदा. शिवाय त्या काळात राज्य समृद्ध, सुसंस्कृत केले. संगीत, काव्य, शिल्प यांना प्रोत्साहन दिले, वगैरे वगैरे…आपल्या शिवबाच्या आधी शंभरेक वर्षं आधी हे घडले.
कधी वाटतं, या काळाच्या प्रवाहात खोडरबराने काही खाडाखोड करावी, किंवा इकडून तिकडे बाण काढून घटनांचा क्रम बदलावा आणि रायाला जरा पुढे ओढावं. म्हणजे तिकडून रायाने आणि इकडून शिवबाने त्या आक्रमक मुस्लिम सत्तांना असा काही मार दिला असता की पळता भुई… त्यातनं रायानं शिवबाला जरा शांत वेळ मिळू दिला असता. त्याच्या राज्यातलं संगीत ऐकवलं असतं, शिल्पं दाखवली असती…
आणि हो, तोही शिवबासारखाच. रायाही सर्व धर्मांचा आदर करणारा. सगळ्या देवस्थानांना अनुदाने देणारा. मुस्लिम आपल्याला समजावेत म्हणून आपल्या राज्यात मुस्लिम वसाहतच वसवली त्यानं. अंगरक्षकही मुस्लिम. कित्येक सरदारही.
इतिहास हा कुणाच्या इच्छेचा प्रश्‍न नसतो, हे माहीत आहे मला, पण सदिच्छेने मनाचे खेळ खेळायला बंदी आहे का? राया, शिवबा, अकबर यांच्यात समान धागा दिसला म्हणून हे स्वप्न पाहिले.
मला तर शिवाजी आणि गांधीजी दोघेही जवळचे वाटतात. एक युद्धवीर आणि दुसरे अहिंसावीर. वरकरणी विरोध वाटेल, पण भव्य स्वप्न तेच, तसेच. त्यासाठी झोकून देणे, जिवाची पर्वा न करता, तसेच. ध्येयासाठी निडरपणे जागी उभे ठाकणे, तसेच अगदी.
शिवाजीच्या काळातल्या लढायांचे आजच्या जीवनात स्थान नाही, पण गांधीजींचा मार्ग मात्र आजही अनुसरता येईल. मग असे करूयात का, शिवबाचे स्वप्न आणि गांधीजींचा मार्ग? पण त्यात हवी त्या दोघांची सर्वसामान्यांविषयीची कळकळ, त्यात हवी आयुष्यभराची अखंड तपश्चर्या, त्याला हवी पुढचे पाहणारी दृष्टी. वा…वा…मी स्वप्नच पाहू लागलो रे शिवबादादा…हसतोस काय मिशीत?…तूच नाही का शिकवलंस मला स्वप्नं पाहायला?

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.